अचानक हाक ऐकली.
वळून पहिलं.
तशी अनोळखी व्यक्ति,
पण हाक तर मलाच मारली होती.
मी म्हटलं आपणास ओळखले नाही,
तर तो म्हणाला एरवी भेट होत नाही आपली, तुम्ही कामात व्यस्त असता.
तरीही मला कळलं नाही की नक्की हा कोण आहे.
साधारण माझाच वयाचा असेल. एव्हाना अरे-तुरे करून बोलावं म्हटलं.
अरे मी खरंच नाही ओळखलं तुला, आपण पुर्वी भेटलोय का कधी?
असं बोलुनही त्याला अजिबात राग आला नाही हे पाहून मलाच माझी थोडी लाज वाटली.
दिसायला तसा सामान्य, फार हुशार नसेल, पण तेज होते थोडे वेगळे.
गोरापान नाही, पण सावळाही न्हवता.
चला चहा पिउन येऊ, आठवेल कदाचित तुम्हाला, असं म्हणत त्याने खांद्यावर हाथ ठेवला पण कॅन्टीन कढे न वळता उलट्या
दिशेने वळवले...
शिक्षक झाल्यास खांद्यावर हाथ टाकून फिरायचं बंदच झालेलं.
कदाचित खरंच चांगला मित्र असावा लहानपणीचा, मी विसरलो.
एक दशक बाराव्वी, सिइटी, इंजिनीअरिंग, एमटेक, आणि दोनदा पिएचडी मध्ये अपयश येण्यात आणि काही नोकऱ्या तत्वात न बसल्यामुळे त्या सोडून पुन्हा पुन्हा नवीन नोकऱ्या शोधण्यात गेलं होतं. एक दशक, ज्या वयात मज्जा करणं अपेक्षित होतं ते फार जास्ती चिंते मध्ये गेलेलं. आणि चिंता करुनही हाती काहीच न्हवत. त्या सर्व गोष्टींचा नादात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, अगदी भावाची बायको - माझी वहिनी ही कोण हे ही विसरल्या सारखंच झालेलं. घरचांनीही तसं सोडुन दिलेलं, की काहितरी अभ्यासात गुंतलाय, उच्च शिक्षण घ्यायचं म्हणतोय, तसं मार्ग दाखवायला कोणिही नसलं तरी कागदावर मार्क तर चांगले दिसतायत. त्याच त्याचा पैशात भागात, फक्त लग्न उशिरा करायचं म्हणतोय इतकंच.
तंत्र शिक्षण यात हरवुन, हाती काहीच नाही, तरिही अजून प्रयत्न सोडले न्हवते. खंत याची न्हवती की बरंच काही सोडलं, पण याची होती की आजची मी कोणीच नाहीये. माझा मताला, माझा विचारांना, माझा इच्छेला काहीच किंमत नाहीये. बहुतेक सोबतचे लोक तसे फार पुढे निघून गेले, पण त्यांचे मार्ग फारच वेगळे होते, आणि मला मात्र नावा आधी डॉक्टर लावायचं होतच. वेळ लागणार गृहीत धरलेलं.
मी अजुनही अशाच विचारात हरवलेलो होतो, आणि तो काहीतरी पुटपुटला. अं, असा आवाज काढताच तो म्हणाला, एक चक्कर जुन्या कॅन्टीन काढे मारून येऊ, आठवेल तुला सगळं. एव्हाना आम्ही कुलसचीव यांचा कार्यालयापुढे पोचलो होतो.
उजव्या बाजुला पाण्याचा फिल्टरवर माझे प्रतिबिंभ दिसले. मला माझी चूक कळाली, आणि त्या जुन्या कॅन्टीन मध्ये पोचताच तो म्हणाला, "आठवलो ना मी आता तरी? २००९ ला भेटलेलो इंजिनिअरिंगला आल्या आल्या. शेवटचा चहा सोबत इथेच प्यायलो होतो. आणि इतके वर्ष स्वतःलाच विसरलास? थोडा वेळ स्वतःसाठी नाही का काढता आला?"